जाऊं द्याना बाळासाहेब : वेगळ्या वाटेवरच्या माणसाची अर्धवट गोष्ट

चित्रपट हे कायम समाजाचं प्रतिबिंब दाखवतं  असं कोणत्या तरी महान माणसाने म्हंटल आहे. काही प्रमाणात हे खरंही आहे.  'देऊळ', 'वळू'  मधून ग्रामीण जीवनाची झलक दाखवत वेगळे  विषय हाताळणार्या गिरीष कुलकर्णीनी यावेळेस थोडा वेगळा पण गावाशीच निगडित असणारा असाच विषय 'जाऊं द्याना बाळासाहेब' मधून  मांडला आहे . पैशामुळे येणारी बेफिकीर प्रवृत्ती , गावमधली जाती पातीची उतरंड, फ्लेक्स संस्कृती यासर्वांवर केलेलं खुसखुशीत भाष्य म्हंजे 'जाऊं द्याना बाळासाहेब'. पोराला राजकारणात आणू पाहणारे राजकारणी वडील अण्णासाहेब मारणे, सुखासीन आयुष्य जगणारा पण वास्तवाची जाण नसणारा मुलगा बाळासाहेब हे कथेचे मुख्य पात्र. बापाने राजकारणासाठी लग्नाची गाठ मोडलेली असल्याने मनाला मार लागलेला बाळासाहेब बापाशी उभा दावा मांडतो. पुढे चुकून रंगमंचावरच नाटक पाहतो, आणि तसंच काहीतरी करायचं या विचाराने गावात तो सुद्धा तसंच काहीतरी करू पाहतो त्या अनुषंगाने त्यात झालेले बदल आणि सुरु झालेला आत्मशोधाचा हा प्रवास, यांची हि तशी पाहिली तर सरधोपट गोष्ट. पण हे सर्व मांडण्यासाठी दिग्दर्शकाने फार मोठा फाफट पसारा मांडला आहे, आणि चित्रपटाची लांबी थोडी वाढली जी थोडी कमी करता आली असती.

असं असलं तरी हि गोष्ट सार्वत्रिक आहे. गाव असो वा शहर चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात.  त्यामुळे आपण याच्याशी पटकन कनेक्ट होतो. जाऊं द्याना बाळासाहेबचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तो यातले संवाद. "मी शब्द शोधतो दिव्य नव्या तेजाचा",  " सारखं आपलं बाळासाहेब, बाळासाहेब"  "स्माईल टाक ना तू "  यासारखे चुरचुरीत संवाद  वेळोवेळी हशा पेरतात.

गाण्यांची गोष्ट म्हणाल तर अजय-अतुल कडे संगीताचा भाग सोपवला कि दिग्दर्शकाला त्या कडे लक्षच देण्याची गरज राहत नाही. इथे पण अगदी असंच अजय-अतुल ने संगीताची जबाबदारी अगदी उत्तमरीत्या हाताळली आहे. तरीही 'मोना डार्लिंग", ‘बेबी ब्रिंग इट ऑन’  सारखी गाणी उगाच कथेत घुसडून लांबी वाढवली आहे असं वाटत राहतं.  'डॉल्बीवाल्या बलाव माझ्या डीजे ला"  सारखी गाणी आधीच गाजत आहेत पण खरं  कौतुक करावं  वाटते  ते  'वाट दिसू देगा देवा, वाट दिसू दे' आणि 'लख्ख पडला प्रकाश  मशालीचा या गोंधळ स्वरूपातल्या गाण्याचं. हे ऐकतांना मनात एक वेगळंच भारी फिलिंग येतं  जे इथे शब्दांत वर्णन करणं शक्यच नाही.

अभिनयाच्या बाजूने जाऊं द्याना बाळासाहेब एकदम तगडा आहे असाच म्हणावं लागेल. मोहन जोशी,  प्रभावळकर, स्पृहा जोशी, सविता प्रभुणे, भाऊ कदम यासारखे तगडे कलाकार आहेत. त्यामुळे अभिनयाची जुगलबंदी अगदी तुफान झालीये. पण  सगळ्यात जास्त कौतुक करावं वाटतं ते 'श्रीकांत यादव ' याच, गिरीष कुलकर्णी आणि श्रीकांत यादव आता जाऊन समीकरणच झालंय.  वळू मधला सुरेश असो , देऊळ मधला आप्पा गलांडे  असो या माणसाने मागच्या सगळ्या भूमिके प्रमाणे इथे पण विकास नावाची बाळासाहेबांच्या मित्राची भूमिका अगदी चोख निभावली आहे. याचा शेवट बाळासाहेब फार मोठा नेता बनतो, गावातले समस्या सोडवतो वगैरे असा करता आला असता पण, दिग्दर्शकाने तसं न करता तो प्रश्न प्रेक्षकांवर सोपवला आहे.

वाट दिसू देगा देवा, वाट दिसू दे
गाठ सुटू देगा देवा, गाठ सुटू दे

असं म्हणत जगताना वेगळी वाट शोधायची प्रेरणा देणारा 'जाऊ द्या ना बाळासाहेब' , 'पॉलिटिकल सटायर' हि आहे असं म्हणायला हरकत नाही . चित्रपटाची लांबी जरी मोठी असली तरी तो दोष दिग्दर्शकाचा न राहता संकलनाचा आहे असे कायम वाटत राहते. एकुणात काय जाऊं द्याना बाळासाहेब हा त्याच्या गाण्यासाठी, गिरीश कुलकर्णी, भाऊ कदम यांच्या डायलॉगबाजी  साठी वन टाईम वॉच नक्कीच आहे.


अवांतर : याचे सुरवातीचे श्रेय नामावली (क्रेडिट्स) नक्कीच चुकवू नका .

Labels: , , , , , , , ,